भारतातील आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) गुरुवारी घोषणा केली आहे. बीएसईने निविदा मार्गाने (टेंडर रूट) ३७५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांच्या पुनर्खरेदीची मंजुरी दिली. प्रत्येकी ८१६ रुपये किमतीला ही पुनर्खरेदी केली जाणार आहे.
बीएसईने यापूर्वी २०१८ सालात १६६ कोटींची आणि २०१९ सालात ४६० कोटींची पुनर्खरेदी करून आपल्या भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे. बीएसईच्या समभागाच्या गुरुवारच्या ७०५.५० रुपये बंद भावाच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिमूल्य भागधारकांना या पुनर्खरेदीतून मिळविता येईल. याआधी कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये एकास दोन समभाग बक्षीस (बोनस) देखील दिले होते.
समभाग पुनर्खरेदीअंतर्गत कंपनी शेअरधारकांकडून स्वतःचे समभाग खरेदी करते आणि गुंतवणूकदारांना रोख रक्कम परत देण्याचा हा कर-कार्यक्षम मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. समभाग पुनर्खरेदीमुळे बाजारात उपलब्ध समभागांची संख्या कमी होते आणि त्यामुळे समभागांचे मूल्यवर्धन होते. बीएसईने मार्चमध्ये सरलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २४ टक्क्यांनी वाढ नोंदवत ८८.६१ कोटी रुपयांचा नफा मिळविला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७१.५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.